Pune (16 Sept.22): राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण

Share This News

पुणे, दि. १६: पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच अंशी मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर पुणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत
पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विलास कानडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर आदी उपस्थित होते.

[ad id=’19047′]

चांदणी चौकातील सहापदरी पूल झाल्यावर या भागातील बरेचसे प्रश्न मार्गी लागतील असे सांगून पाटील म्हणाले, या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि त्यासाठी वाहतूक वळवण्यासाठी काही बाबतीत हा पूल उपयुक्त होईल. पुणे शहराची गतीने वाढ होत आहे. उद्योग, व्यापार, शैक्षणिक क्षेत्र आदींमध्ये शहर पुढे राहण्यासाठी रस्ते, उडाणपूल, मेट्रो, पूल आदी पायाभूत सुविधांची निर्मिती गरजेची आहे. चांगल्या प्रकारचे घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ पाण्याची व्यवस्था, शांतता आदीमुळे सर्वांनाच हे शहर राहण्यासाठी सुरक्षित वाटते.

पाटील पुढे म्हणाले, येत्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहे. मेट्रो, सर्व भागात २४ तास समप्रमाण पाणी पुरवठा, जायका प्रकल्प आदी प्रकल्प गतीने पूर्ण करायचे आहेत. पाषाण- सूस भागातील घनकचरा प्रकल्प हलवण्याची नागरिकांची मागणी असून येथील लोकप्रतिनिधींनी नागरी वस्तीपासून दूर असलेली योग्य जागा शोधावी. या जागेचे संपादन करून तेथे हा प्रकल्प स्थलांतरीत करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

[ad id=’18288′]

उद्घाटन करण्यात आलेल्या पूलाला राजमाता जिजाऊ भोसले यांचे नाव देण्यात येईल आणि राजमाता जिजाऊंचा पुतळाही या ठिकाणी उभा केला जाईल, असेही पाटील म्हणाले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, १९९५ नंतर उड्डाणपूल, तसेच रस्त्यांच्या बाबतीत राज्यात चांगली पाऊले टाकली गेली आहेत. शहरात मोठ्या पावसामुळे सिग्नल व्यवस्था बंद पडू नये यावर उपाययोजना करणे आणि अशावेळी ऐनवेळचे वाहतूक नियोजन करणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा, सांडपाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.

[ad id=’17601′]

माजी महापौर मोहोळ म्हणाले, या भागातील वाहतूक कोंडीवर हा पूल उपयुक्त ठरणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. १०० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करणारे देशातील ५ व्या क्रमांकावर पुण्याचा समावेश आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी प्रास्ताविकात पुलाबाबत माहिती दिली. हा पूल ४७० मीटरचा असून पुलामुळे कात्रज व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

फेब्रुवारी २०२० पासून काम सुरू झालेल्या या पुलाचे काम कोविडकाळातही गतीने सुरू ठेऊन पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला.